मुंबई : कुणीही घाबरायचं कारण नाही. आलेल्या संकटावर मात करु आणि विजयाची गुढी उभारु असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना विश्वास दिला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना व्हायरस हा छुपा शत्रू आहे, तो कुठून हल्ला करेल हे सांगता येत नाही. घराबाहेर पाऊल आपण टाकलं तर शत्रू आपल्या घरात पाऊल टाकेल हे विसरु नका. या करोनाला हरवण्याा संकल्प करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
घरांमध्ये लोक एकत्र आले आहेत. घरातले एसी बंद करा, घरातल्या खिडक्या दरवाजे उघडा असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. काल काहीशी गोंधळाची परिस्थिती होती. त्यामुळे मी सकाळी शुभेच्छा द्यायला आलो नाही.
तर दुपारी आलो असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होणार नाही, बंदही होणार नाही. वैद्यकीय सेवाही बंद होणार नाहीत याचा उद्धव ठाकरेंनी पुनरुच्चार केला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मांडलेले ठळक मुद्दे :
- भाजीपाल्याची दुकानंही बंद होणार नाहीत. गर्दी करू नका.
- जीवनावश्यक वस्तूंच्या सेवेवर कुठलाही परिणाम होऊ दिला जाणार नाही.
- हातावर पोट असलेल्यांचं किमान वेतन थांबवू नका; मुख्यमंत्र्यांचं उद्योजक, कंपनी व मालकवर्गाला आवाहन.
- मदतीचे अनेक हात पुढं येत आहेत.
- घरात मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतोय, तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका.
- घरात सगळे एकत्र आलेत. आजपर्यंत जे गमावलंय, ते परत मिळतंय.
- तुम्ही घराबाहेर गेलात तर शत्रू तुमच्या घरात येईल.
- पुढच्या पिढीची जबाबदारी आपली आहे.
- जीवनावश्यक काही आणायला जाल तर एकट्यानं जा.