मुंबई : राज्यातील सत्तास्थापन्याचा पेच लवकरच सुटणार आहे. त्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आज दिल्लीत अंतिम बैठक होत असून, त्यामध्ये मंत्रीमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
आज पार पडणाऱ्या या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के.सी.वेणुगोपाल आणि राज्यातील काही नेते मंडळी सहभागी होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील सहभागी होतील. या सर्व नेत्यांच्या बैठकीत मंत्रीमंडळाच्या खातेवाटपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी भेट घेतली होती. मात्र, पवारांनी त्या भेटीबद्दल कोणतीही माहिती माध्यमांनी दिली नव्हती. त्यानंतर राज्यातील इतर नेत्यांची भेट दिल्लीत होणार आहे. आजच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसात चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगितले. डिसेंबरपूर्वी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आजच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.