आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी आहे, अशी भूमिका नितेश राणे यांनी व्यक्त केली. नितेश राणेंच्या या भूमिकेवरून माजी खासदार निलेश राणे यांनी विरोध केला. यामुळे राणे कुटुंबियांमध्ये वाद झाला आहे. नितेश यांना शिवसेनेकडून पराभवाची भीती वाटत आहे. त्यामुळे त्यांनी मातोश्रीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न आहे. अशी चर्चा रंगली आहे.
आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळात येण्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार आहे, असं नितेश राणे यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. नितेश राणे हे कणकवली मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे महायुती असूनही शिवसेनेने केवळ नितेश राणे यांच्याविरोधात कणकवलीतून अधिकृत उमेदवार उभा केला आहे. सतीश सावंत यांना सेनेने तिकीट दिल्यामुळे शिवसेना-भाजपमध्येच चुरस निर्माण झाली आहे.
मतदानाला काही दिवस राहिले असतानाच नितेश राणेंनी मवाळ भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेचा विरोधही निवळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता नितेश राणेंना घरातूनच विरोध होताना दिसत आहे. ‘नितेशच्या ह्या विषयाशी मी जराही सहमत नाही. ज्या पक्षाने राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरूनच करणार.’ अशा शब्दात निलेश राणेंनी विरोध केला आहे.
काय म्हणाले होते नितेश राणे
नितेश राणे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मैत्रीचा हात पुढे केला. ‘राज्याच्या विकासासाठी आदित्य ठाकरेंना सहकार्य आणि त्यांच्यासोबत काम करण्यास मी तयार आहे. आदित्य यांची विधानसभेच्या पायऱ्यांवर भेट व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यांनी घेतलेली भूमिका अतिशय सकारात्मक आहे.’ असं नितेश राणे म्हणाले होते.