अकोला – शेतकऱ्यांची कुणालाही भीती राहिली नाही. ऊस वगळता कोणत्याही पिकाला हमीभाव नाही. शेतकऱ्यांनी तुरीची डाळ करून निर्यात केल्यास त्याचा अधिक फायदा होईल. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, असा एल्गार खासदार राजू शेट्टी केला. ते शेतकरी एल्गार मेळावाव्यात बोलत होते.
जनमंच शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय किसान संघ, शेकाप यांच्या संयुक्त विद्यमाने आज खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात मूर्तिजापूर येथे शेतकरी एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्याला रवीकांत तुपकर, प्रा. शरद पाटील हे उपस्थित होते.
या मेळाव्याची सुरुवात कपाशीच्या झाडाचे पूजन करून करण्यात आली. मेळाव्यामध्ये एकरी २५ हजार रुपये बीटी कंपन्यांकडून शेतकर्यांना लागवड खर्चाची नुकसान भरपाई देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश देऊनही विदर्भातील शेतकर्यांना अजून पर्याय न दिलेली हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत विनाविलंब द्यावी, कर्जमाफीसाठी दीड लाखापेक्षा जास्त कर्जाची उर्वरित रक्कम भरण्यासाठी ३१ डिसेंबर या अंतिम तारखेऐवजी ३० जून २०१८ अंतिम तारीख करावी, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा या दराने शेतमालाला हमीभाव जाहीर करावा यांसह अन्य मागण्या या मेळाव्यात करण्यात आल्या.