शिवसेना ५०-५० च्या फॉर्म्युल्यावरून आक्रमक झाली आहे. जो पर्यंत चर्चा होणार नाही तो पर्यंत पुढील चर्चा नाही. असा पवित्रा घेतलेला असताना आज देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. यावेळी फडणवीस म्हणाले की, अफवांवर विश्वास ठेऊ नका. चर्चा झाली नाही तर मजा येत नाही.
पुन्हा निवडून आल्यामुळे जबाबदारी वाढली आहे. यंदा भाजपामध्ये सर्व समाजाचे प्रतिनिधी निवडून आले. हे सर्वस्पर्शी, सर्व्यवापी सरकार आहे. आपल्याला आणखी चांगलं काम करायचं आहे असे ते म्हणाले. फडणवीस यांनी यावेळी दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प बोलून दाखवला. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याचं योग्य नियोजन करुन वाहून जाणारे पाणी शेतीपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीला पाणी आणि हाताला काम देण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक म्हणून काम केलं. पुढे सुद्धा असचं काम चालू ठेवणार असल्याचे फडणवीस म्हणाले. भाषणाच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.
गेल्या पाच वर्षात दीनदलित, गोरगरीब, मराठा समाज प्रत्येक समाजाच्या आशा, अपेक्षा आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. काही बाकी राहील असेल तर ते पूर्ण करण्याची ताकत आपल्यात आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करु शकलो हे आपले यश असल्याचे फडणवीस म्हणाले.