मुंबई: इंडिगो एअरलाईन्सचे मुंबईहून लखनौला जाणारे विमान पाच तास उशीरा आल्याने संतप्त नागरिकांनी शनिवारी संध्याकाळी विमानतळावर गोंधळ घातला.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लखनौला जाणारे हे विमान ७ वाजून ३५ मिनिटांनी निघणार होते. कर्मचाऱ्यांनी वाईट वर्तणूक केल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला.
“इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी आमच्याशी गैरवर्तणूक केली. त्यांनी आम्हाला विमानाचे बोर्डिंग करू न देता एक तास वाट बघायला लावले. त्यांच्याकडे योग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे फार गैरसोय झाली.” असे एका प्रवाशाने सेल्फी व्हिडिओद्वारे सांगितले. दुसऱ्या एका प्रवाशाने विमान अधिकारी योग्य प्रकारे संवाद साधत नसल्याचा आरोप केला. “सर्व इंडिगो कर्मचाऱ्यांनी लोकांसोबत गैरवर्तन केले. मी याविषयी इंडिगोला टॅग करून ट्विट केले. त्यांनी माझा फोन नंबर मागितला परंतु मला फोन केला नाही.” असेही आणखी एका प्रवाशाने सांगितले.