पाटणा : नव्या नागरिकत्व संशोधन कायद्यावरून (CAA ) देशभरात उद्रेक पसरला आहे. देशातील बिगर भाजपशासित राज्यांनी या कायद्याला तीव्र विरोध केला आहे. सत्तेत सहभागी असलेल्या जेडीयूने या कायद्याला विरोध केल्याने केंद्र सरकार व बिहार सरकार यांच्यातील संबंध नागरिकत्व कायद्यावरून बिघडण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपची सध्यातरी कोंडी झाली आहे.
जेडीयू नेते प्रशांत किशोर यांनी रविवारी ( १२ जानेवारी ) एक ट्विट केले असून बिहारमध्ये नागरिकत्व संशोधन कायदा लागू होणार नसल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे. जेडीयू नेते प्रशांत किशोर यांनी हे ट्विट करून थेट बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाच आव्हान दिले आहे. बिहारमध्ये नागरिकत्व आणि एनआरसी हे केंद्र सरकारचे दोन्ही कायदे लागू होणार नसल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, प्रशांत किशोर यांनी या ट्विटमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे आभार मानले आहे. प्रशांत किशोर यांच्या या ट्विटमुळे जेडीयूमध्ये संभ्रम पसरला आहे.
I join my voice with all to thank #Congress leadership for their formal and unequivocal rejection of #CAA_NRC. Both @rahulgandhi & @priyankagandhi deserves special thanks for their efforts on this count.
Also would like to reassure to all – बिहार में CAA-NRC लागू नहीं होगा।
— Prashant Kishor (@PrashantKishor) January 12, 2020
जेडीयूने नागरिकत्व संशोधन कायद्याला पाठिंबा देत भाजपला मदत केली होती. जेडीयूने लोकसभेत व राज्यसभेत घेतलेल्या भूमिकेविरोधात प्रशांत किशोर यांनी आजचे ट्विट केले आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसापूर्वीच केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात नवीन नागरिकत्व कायदा लागू करण्यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. या कायद्याची अंमलबजावणी करणे सर्व राज्याला बंधनकारक आहे, असे वारंवार केंद्र सरकारने या कायद्याचे समर्थन करताना म्हटले आहे.
देशातील नऊ राज्यात हा कायदा लागू करण्यास स्पष्टपणे नकार…
भाजपशासित राज्य वगळता इतर राज्यांनी नागरिकत्व संशोधन कायद्याला जोरदार विरोध केला आहे. देशातील नऊ राज्यात हा कायदा लागू करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यात जेडीयूचे नेते प्रशांत किशोर यांच्या एका ट्विटमुळे आणखी संभ्रम वाढला आहे. प्रशांत किशोर यांच्या या ट्विटनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.