मुंबई | भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्या संभाजी भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांना याकुब मेननचाच न्याय लावावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते बुधवारी महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी म्हटले की, मुंबई बॉम्बस्फोटात याकुब मेमनचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. मात्र, गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता त्याच्यावर ३०२ चे कलम लावण्यात आले. त्यामुळे याकुब मेमनवर लावलेली कलमे भिडे गुरूजी आणि एकबोटे यांनाही लावा, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
याशिवाय, त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन शांततामय पद्धतीनेच करा, असे आवाहन केले. ज्यांना आंदोलनात सहभागी व्हायचे नाही, त्यांनी होऊ नये. इतरांनी त्यांच्यावर आंदोलनात सहभागी होण्याची सक्ती करू नये, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र आंदोलन बंद आंदोलनाचे समर्थन केले. आपल्या देशात प्रत्येकाला कोणता देव किंवा धर्म मानायाचा याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, सध्या काही लोक त्यांचा देव किंवा धर्म दुसऱ्यांवर लादू पाहत आहेत. भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्यानिमित्ताने त्याचा प्रत्यय आला. त्यामुळेच आम्ही ही सक्ती झुगारत आहोत, हे दाखवून देण्यासाठी आजचा संघटित बंद पुकारण्यात आल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. तसेच सरकारने भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या चौकशीसाठी दलित समाजाचा न्यायाधीश नेमू नये. तसे केल्यास ते सवर्णांवर अविश्वास दाखवल्यासारखे होईल. शासनाला याबाबत निर्णय घेता येत नसल्यास त्यांनी आम्हाला सांगावे. आम्ही त्यांना नाव सुचवू, असेही आंबेडकर यांनी सांगितले.