मुंबई : राज्यात उंदीर आणि चहा घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतांना ठाणे महापालिकेतला जेवण घोटाळा समोर आला आहे. महापालिकेने जेवणावर झालेला खर्च म्हणून जवळपास १० लाख रुपये हॉटेल बिलाची रक्कम २ वेळा दाखवू घोटाळा करण्यात आला.
मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसात विधानभवनात चांगलाच गदारोळ झाला. हा मुद्दा ताजा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील चहाच्या बिलावरुन पुन्हा एकदा विरोधकांनी सरकारला घेरले होते. त्याप्रमाणेच आता ठाणे महापालिकेतही हॉटेलच्या बिलावरुन वातारवरण चांगलेच तापले आहे.
राज्यात कधी काय घोटाळा उडकीस येईल कुणीही काहीही सांगू शकत नाही. मंत्रालयात उंदीर घोटाळा भाजपाचेच ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांनी समोर आणला. हे प्रकरण ताजे असतांनाच काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील कोट्यवधी रुपयांच्या चहाचा घोटाळा माहिती अधिकारांतर्गत समोर आणला. सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरु असतांनाच आता ठाणे महापालिकेतील जेवण घोटाळा समोर आला आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीत ३ वर्षांपूर्वी २८ मार्च २०१५ ला ठाण्याच्या वागळे स्टेट परीसरातील किसननगर शिवशक्ती नगर भागात पाईप लाईन फुटली होती. त्यावेळी पाईपलाईनला लागून असलेल्या सर्व घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि ठाण्यातील सर्व शिवसैनिकांनी धाव घेऊन पीडितांना तात्काळ मदत केली. बेघर झालेल्यांची जेवणाची सोय ठाण्यातील एका हॉटेलमधून केली होती. त्या जेवणाचे पैसे आमदार एकनाथ शिंदे यांनी स्वत: भरले आहेत, असा दावा शिवसैनिंकानी केला होता. पण आता ते बिल पालिकेने भरल्याचे समोर आले आहे. पाईपलाईन फुटल्याने २८ मार्च २०१५ ते १ एप्रिल २०१५ या ५ दिवसात बाधीतांच्या कुटुंबीयांना, पालिका कर्मचाऱ्यांना भोजन आणि नाश्ता आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत दिला गेला. त्यावेळी प्रत्येकी ३ हजार बाधितांना एक वेळेचा ३० रुपये प्रमाणे नाश्ता आणि प्रत्येकी ७० रुपये प्रमाणे २ वेळेचे जेवण दिले गेले होते. असे एकूण ५ दिवस जेवण नाश्ता दिले होते. त्याचे बिल १५ लाख ९० हजार रुपये झाले होते. यातील ६ लाख १० हजार रुपये सामाजिक संस्थांनी मदत केल्याने ते पैसे चुकते झाले. त्यानंतर ३ वर्षानंतर उर्वरीत ९ लाख ८० हजार रुपये जेवणाचे बिल देणे बाकी आहे. हे जेवण वागळे स्टेट रोड नंबर १६ वरील हॉटेल शिव प्रसाद येथून घेतले गेले होते. उर्वरीत त्या बिलाचे पैसे आयुक्त संजीव जैस्वाल यांनी १६ फेब्रुवारी २०१८ ला आदेशानुसार चुकते करण्यात येणार होते. त्यासाठी हा विषय कलम ३५ (अ) नुसार महासभेच्या मंजुरीकरता २८ मार्चच्या सभेत मांडण्यात आला होता आणि तो मंजूर ही झाला होता. २०१५ च्या पाईपलाईन घटनेच्या वेळचे जेवणाचे बिल आम्ही शिवसैनिकांनीच भरल्याचा दावा आजही शिवसैनिक करत आहेत. हा प्रशासकिय अधिकाऱ्यांचा घोटाळा आहे, असा आरोप ठाणे महापालिकेचे नगरसेवक एकनाथ भोईर यांनी केला. २८ मार्चच्या महासभेत या प्रस्तावाला त्यांनी विरोध देखील केला होता. त्यावर“२०१५ या वर्षी कोणी बिल भरले आहे. हा आमचा मुद्दा नाही, आमच्याकडे ते बिल रितसर मार्गाने आले आहे आणि स्थायी समिती नसल्याने आम्ही ते कलम ३५ (अ) नुसार महासेभत सादर केले. त्यास मंजुरीही दिली आहे. गेली ३ वर्षे आम्ही या संबंधीच्या फाईलचा पाठपुरावा करत असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेमार्फत देण्यात येत आहे. मात्र एकदा हॉटेलचे बिल भरल्यानंतर पुन्हा बिल का काढण्यात आले. असा प्रश्न उपस्थित होत आहेत.