रत्नागिरी : ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागतादरम्यानच कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येत असल्याने कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांना फटका बसणार आहे. येत्या २७ आणि २८ डिसेंबर रोजी दोन दिवस कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या दहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहे. त्याचा फटका कोकण आणि गोव्यातील पर्यटनालाही बसणार आहे.
रत्नागिरीतील आडवली रेल्वे स्थानकावर शुक्रवार २७ डिसेंबर रोजी लूप लाइनचे काम हाती घेतले जाणार आहे. मध्यरात्रीपासून हे काम सुरू होणार असल्याने २७ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून निवसर ते विलवडे स्थानकादरम्या रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. २८ डिसेंबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत म्हणजे आठ तास ही वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरील दहा लांबपल्ल्याच्या गाड्या बंद ठेवण्यात येणार आहे.
कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची प्रचंड गैरसोय होणार…
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोक कोकण आणि गोव्यात येतात. त्यानिमित्त कोकण आणि गोव्यातील हॉटेल आधीच बुक केलेली असतात. त्यामुळे कोकण आणि गोव्यातील पर्यटन व्यवसाय या काळात प्रचंड तेजीत असतो. नेमकं याच दरम्यान कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक असल्याने कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. अनेक पर्यटकांना विमानाने किंवा रोडमार्गे कोकण आणि गोव्यात जावं लागणार आहे तर काहींना कोकण-गोव्यातील बेत रद्द करून इतरत्र जाण्याचा बेत आखावा लागणार आहे.