कणकवली: राणे ही पाठीत वार करणारी औलाद आहे. मातोश्रीच्या मिठाला जागला नाहीस, मला काय शिकवतोस अशा शब्दात शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणेंवर सडकून टीका केली.
उद्धव ठाकरे कणकवलीत शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी राणे पिता-पुत्रांवर सडकून टीका केली आहे. नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना भाजपात प्रवेश दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला शुभेच्छा दिल्या. राणेंना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला त्यावेळी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. राणे जिथे जातील तिथे वाट लावतात. आधी काँग्रेसची आणि आता स्वत:ची विल्हेवाट लावली.
माझा कुठल्या व्यक्तीविरुद्ध लढा नाही. कोकण विरुद्ध खुनशी वृत्ती असा हा लढा आहे अशा शब्दात त्यांनी राणेंवर टीका केली. मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार म्हटल्यावर याला सातबारा कळतो का ? असे कोणीतरी म्हणाले. मी कोणाच्या जमिनी बळकावल्या नाहीत. जमिनी हडप केल्या नाहीत. त्यामुळे मला सातबारा कळत नाही असे उद्धव म्हणाले.
मातोश्रीच्या मिठाला जागला नाहीस, मला काय शिकवतोस अशा शब्दात उद्धव यांनी राणेंवर टीका केली. देवेंद्र फडणवीसांनी राणेंना पाच वर्ष थांबायला सांगाव बघा ते थांबतात का? असे उद्धव म्हणाले. भाजपाकडून भ्रम निरास झाल्यावर बघा हेच राणे काय बोलतात ते. गुंडगिरी मोडून तोडून टाकली म्हणून कोकण भगवं झालं असे उद्धव म्हणाले. रमेश गोवेकर कुठे गायब झाले? खुनशी वृत्ती अजिबात सहन करणार नाही. मी भाजपावर टीका करायला आलेलो नाही.
संदेश पारकरांना का उमेदवारी दिली नाही ? असा सवाल उद्धव यांनी विचारला. आज स्वाभिमान शब्द सगळयात खूश झाला असेल. सगळीकडे माना वाकवतात आणि स्वाभिमान म्हणतात. उद्धव ठाकरे मैत्रीला आणि दोस्तीला जागणारा माणसू आहे. चोर, दरोडेखोर घुसले तर आपण मित्राला सावध करतो म्हणून आज कोकणात आलो आहे. असेही उद्धव म्हणाले. शिवसेना उमेदवाराला निवडून आणण्याचं आवाहन केले.