ठाणे : ठाणे येथे वर्तकनगरातील साईनाथ मंदिराच्या उत्सवासाठी प्रसादाकरीता 30 टन लाडू बनविले जात आहेत. हे लाडू वर्तकनगर येथील साईनाथ सेवा समिती तर्फे बनवण्यात येत आहे.
साईबाबा मंदिराच्या 33 वा वर्धापन दिनानिमित्त 20 ते 22 नोव्हेंबर दरम्यान वर्धापन दिनाचा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी लाखो भाविक या मंदिरात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भाविकांना प्रसाद म्हणून नि:शुल्क हे लाडू वाटप करण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ठाण्यातील वर्तकनगर या भागातील साईनाथ मंदिरात साईनाथ सेवा समितितर्फे भजन, किर्तन, दर्शनाचा व प्रसादाचा लाभ मिळणार आहे. 30 टन लाडू बनविण्यात आले आहेत. यामध्ये 10 टन चणाडाळ, साखर असे साहित्य मिळून तब्बल 30 टन लाडू प्रसाद म्हणून दिला जातो.
यंदा लक्ष्मी नारायण महापूजा 20 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली असून तीन दिवस वेगवेगळे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी साई मंदिर झळाळून निघाले आहे.