ठाणे: पुण्यातील वाफगाव येथील आद्य स्वातंत्र्यसेनानी महाराजा यशवंतराव होळकर जन्मस्थान असलेल्या होळकर किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे अशी मागणी धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
होळकरांच्या वैभवशाली इतिहासाचे उदाहरण म्हणजे वाफगावचा भुईकोट किल्ला होय. हा किल्ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपल्या राज्यकाळात बांधला.हा किल्ला श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) यांचे जन्मस्थान असलेला होळकर किल्ला आहे या किल्ल्याची दुरवस्था झाली असून शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.यासाठी हा किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावा याबाबत धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी याबाबत शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडे आपले सरकार ऍप्सवरून मागणी केली आहे. एकीकडे मुख्यमंत्री पुरातन वस्तू जतन करू त्याची जपणूक करूअसे म्हणत असताना होळकर किल्ल्याची होत असलेली दुर्दशा शासनाच्या नाकर्तेपणाचा उदाहरण आहे.
होळकर किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे यासाठी गेले १० वर्ष इतिहास संशोधक संजय सोनवणी सातत्याने पाठपुरावा करत असताना देखील शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने धनगर समाजामध्ये नाराजी आहे.सुभेदार मल्हारराव होळकर व महाराज यशवंतराव होळकर हे धनगर समाजाचे दैवत आहे आणि दैवतांच्या वस्तूची होत असलेली दुर्दशा धनगर समाज कदापि सहन करणार नाही याबाबत सरकारने गांभीर्याने दाखल घेऊन होळकर किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावा अन्यथा धनगर समाज आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा धनगर प्रतिष्ठाने दिला आहे.