औरंगाबाद : औरंगाबादच्या लोटाकारंजा भागात मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याच्या कारणावरून एमआयएम आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामुळे येथे चोख पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आले.
मंजूरपुरा लोटाकारंजा येथे बोगस मतदान होत असल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या मुलाने एमआयएमच्या पोलिंग बूथचा टेबल फेकला. यावेळी दोन्ही गटात शिवीगाळ होऊन त्याचं पर्यावसान हाणामारीत झालं. त्यामुळे या भागात तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने तातडीने पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
राष्ट्रवादी आणि एमआयएमचे कार्यकर्ते आमनेसामने येऊ नये म्हणून पोलिसांनी या परिसरात गस्त घालायला सुरुवात केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच खासदार इम्तियाज जलील यांनी मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली. सध्या कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.