औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेनंतर औरंगाबादेत आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या बंगल्यावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला. जाधव हे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप जाधव कुटुंबियांनी माध्यमांशी बोलताना केला. शिवसेनेने सर्व आरोप फेटाळले.
या हल्ल्यात हर्षवर्धन जाधव यांच्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हल्लेखोरांनी त्यांच्या बंगल्यावर दगडफेक केल्याने घराच्या काचा फुटल्या. गाडीचे नुकसान केले. मात्र, प्रचारासाठी सध्या हर्षवर्धन जाधव कुटुंबासह कन्नड मतदारसंघात असल्यामुळे सगळे सुखरुप आहेत.
दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी खालच्या भाषेत टीका केली होती. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले आमदार अब्दुल सत्तार यांच्यावरुन हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली होती. त्यानंतर त्यांचं हे भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होत. यावरून हा हल्ला करण्यात आला असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
जाधव यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला होता. वंचित आघाडीकडून इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता. जाधवमुळे शिवसेनेचा पराभव झाला असा आरोप खैरेंनी केला होता. तेव्हापासून हा वाद सुरु आहे.
काय होता वाद…
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
“जर आपली लोकं शिवसेनेची असतील, भाजपची असतील, चुका झाल्या तर कान खेचा, मीही त्यांचे कान उपटल्याशिवाय राहणार नाही. मी कन्नडमध्ये सभेला गेलो होतो. तेथेही मी हेच बोललो. कन्नडमधील एक विश्वासघातकी, ज्यानं भगवा उतरविण्यामध्ये हिरव्याची साथ दिली होती. त्याला आता अजिबात माफ करणार नाही. चुकतोय, लहान आहे म्हणून मी गेल्या 5 वर्षे त्याच्या चुका पोटात घालत होतो. पण भगव्याशी हरामखोरी मी सहन करु शकत नाही”, असे उद्धव ठाकरे हर्षवर्धन जाधव यांच्याबद्दल बोलले होते.
काय म्हणाले होते हर्षवर्धन जाधव ?
“जर मी निवडणूक लढवून मुस्लीम उमेदवाराला मदत केल्याचा तुम्हाला राग आला, तर मग अब्दुल सत्तार तुमचा कोण? अब्दुल सत्तार तुमचा पाहुणा आहे का?” असे म्हणत जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.
हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरेंचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप…
हल्ल्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. खैरे यांनी जाधव यांना सायको म्हटले तर जाधव यांनी खैरेंचा लोकसभेत पराभव झाल्यामुळे त्यांचा मानसिकस्थिती खराब असल्याचा आरोप केला.