औरंगाबाद : हिंगणघाटमध्ये तरुणीला पेटवल्याची घटना ताजी असताना औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यात अंधारी गावात महिलेला घरात घुसून जिवंत जाळण्यात आले होते. यामध्ये ५० वर्षीय महिला ९५ टक्के जळाली होती. अखेर तिचा उपचारादरम्यान औरंगाबादमध्ये मृत्यू झाला.
२ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री ११ वाजता फिर्यादी घरात एकटीच असताना गावातील आरोपी संतोष सखाराम मोहिते (५०) हा तिथे आला व त्याने फिर्यादीच्या घराचे दार वाजवले. दार उघडताच समोर आरोपी संतोष दिसल्यामुळे, ‘तू रात्री-अपरात्री का येतो, तुझ्यामुळे माझी समाजात बदनामी झाली आहे’ असे ती त्याला म्हणाली. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले व संतप्त आरोपी संतोषने तिला शिवीगाळ व मारहाण करीत घरातील कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले आणि आरोपी पळून गेला.
या प्रकरणी सिल्लोड तालुक्यातील ५० वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, संबंधित पीडित महिला एकटीच राहते व तिच्या दोन्ही मुलींचे लग्न यापूर्वीच झाले आहेत. घटनेच्या तिसऱ्या दिवशी महिलेची मृत्यूशी झुंज संपली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
आरोपीला पोलीस कोठडी…
महिलेवर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात आरोपी संतोष सखाराम मोहिते याला मंगळवारी (४ फेब्रुवारी) अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता, आरोपीला सोमवारपर्यंत (१० फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांनी दिले आहेत.