हिंगोली : नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आज शुक्रवारी महाराष्ट्रात हिंगोलीमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनालाही हिंसक वळण लागले आहे. संतप्त आंदोलनकर्त्यांना तीन एसटीबसवर दगडफेक केली. यामध्ये एक बस वाहक आणि एक प्रवासी जखमी झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात मुंबईसह औरंगाबाद, पुणे, मालेगाव, धुळे,लातूरसह विविध शहरांमध्ये नागरिकत्व कायदा विरोधी आंदोलन होत आहेत. आज मराठवाड्यातील हिंगोली शहरात आज सकाळी सुरू करण्यात आले. मात्र हिंगोलीतील कळमनुरी भागात या आंदोनाला हिंसक वळण लागले. सुमारे २० ते २५ जणांच्या एका गटाने ही दगडफेक केली असं पालिसांनी माध्यमांना सांगितले. मात्र दगडफेक करणारे आंदोलक होते की काही समाजकंटक आंदोलनात घुसून दगडफेक करत होते, याचा शोध हिंगोली पोलीस घेत आहेत. दरम्यान, वाहकाच्या तक्रारीवरून या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अजूनही या प्रकरणी कुणालाही अटक झालेली नाही.
देशात विधेयकाविरोधात नागरिक संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे आंदोलनादरम्यान आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यात या घटना घडल्या आहेत. हिंसेच्या घटना आणि अफवा पसरू नयेत यासाठी उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आजही महाराष्ट्रात ब-याच भागात आंदोलन होणार आहेत.