जालना : ‘या निवडणुकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचं राजकारण बदलेल’, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला भाजप सरकार घालवले नाही, तर पंतप्रधान मोदी तुमच्या बँक खात्यातील रक्कम काढून घेतील, असा टोलाही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांनी लगावला.
विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची जालनाच्या घनसावंगी येथे सभा झाली. यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की, आपण घराणेशाही विरोधात बोलतो, त्यांच्या येथेही घराणेशाही आहे. उमेदवारांना दुसऱ्याच्या बॅग उचलण्याच्या पलीकडे दुसरा मार्गच नाही. ना सन्मान, ना मान, ना सत्ता आणि म्हणून महाराष्ट्राची निवडणूक अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या दृष्टीने महत्वाची असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं. आम्ही सत्तेत येण्याचा प्रयत्न केला, पण ते जमले नाही. पण यावेळेस मात्र, उमेदवारी मिळाली, संघटन मिळाले आणि मदतही मिळाली त्यामुळे आता संधीचं सोनं करण्याची वेळ आली असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.
ही निवडणूक महत्वाची आहे, इथली दृष्टी बदलायची आहे. जे सगळे उमेदवार आम्ही उभे केले, ती माणसं आहेत, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी वंचितला निवडूण देण्याचं आवाहन केलं. तसेच, ‘हे भाजप सरकार घालविलं नाही, तर मोदी तुम्हाला 15 लाख रुपये तर देणार नाहीच, उलट तुमच्या बँकेत जेवढे पैसे आहेत, त्यापैकी 90 टक्के घेतल्याशिवाय राहणार नाही’, अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर केली.