जालना : गावच्या गावं उद्धवस्त झालेली असताना, सरकारला पंचनामे करायची गरज काय? असा संतप्त सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केला.
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदील झालं आहे. काळजीवाहू सरकारने मदत केली नाही. सरकारने पंचनाम्याचा घाट घातला आहे. सर्व शेती अवकाळी पावसाने वाहून गेली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत करा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराही शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.
परतीच्या पावसामुळे शेतातील पीकं वाहून गेली आहेत. नदीकाठच्या जमिनीही देखील वाहून गेल्या आहेत. त्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत करण्यात यावी. नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना आधाराची गरज असताना सत्ता कशी मिळवता येईल, याकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.