लातूर : काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणुन ओळख असलेल्या लातूर जिल्हयात पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरांनी मुसंडी मारुन या बालेकिल्ल्याचे बुरुज खिळखीळे करुन टाकले. जिल्हा परिषद, महानगरपालिका, लोकसभा व इतर निवडणुमध्ये विजय संपादन करुन काँग्रेस पक्षाला व त्या अनुषंगाने येथील नेतृत्वाला आसमान दाखविण्याचे काम केले. एवढे होवून ही आता खुद्द आमदार अमित देशमुख यांनीच पालकमंत्र्यांनी लातूर जिल्हयात विविध विकासकामे राबवून जिल्हयाचा नावलौकिक केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. या कृतीने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व सामान्य नागरिकांसह राजकिय निरिक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत. नेमकं आमदार अमित देशमुख यांच्या मनात चाललयं तरी काय? हा प्रश्न पडला आहे.
शनिवार रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार अमित देशमुख यांनी पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. लातूर जिल्हयात विविध विकासकामे राबवून जिल्ह्याचा नावलौकिक केल्याबद्दल त्यांनी हा ठराव मांडला. त्यास ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे यांनी अनुमोदन दिले. या बैठकीत मांडलेल्या या ठरावाने सारेच आचंबित झाले. आमदार अमित देशमुखांच्या मनात चाललयं तरी काय? अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती