मुंबई: उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे या उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे सर्वसामान्यांची लाहीलाही होत आहे, आता लवकरच पाऊस येणार असल्याचे संकेत आले आहेत. हवामान विभागाने बळीराजासह सर्वांना गुड न्यूज दिली आहे. मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला आहे. लवकरच तो केरळकडे वाटचाल करेल. केरळात दाखल झाल्यानंतर तो लवकरच कोकणमार्गे संपूर्ण महाराष्ट्रात प्रवेश करेल.
गेल्या वर्षी ३० मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता. यंदा तो त्यापूर्वीच येणार आहे.
यानंतर पुढील काही तासात मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागर परिसरात दाखल होईल.
यंदा सरासरी पाऊस राहील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या ९७ टक्के पाऊस पडेल, असं भाकीत आयएमडीने वर्तवलं. गेल्या वर्षी आयएमडीने ९६ मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे पाऊस ९५ टक्के पडला.
स्कायमेटचा अंदाज काय?
यंदा देशभरात समाधानकारक मान्सून राहील, असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचं तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असं स्कायमेटने नमूद केलं आहे.
मान्सून महाराष्ट्रात कधी?
मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर पुढील २४ तासात त्याची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, केरळचा बराच परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडीचा परिसरात होते. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात २ ते ३ जून रोजी पूर्व मोसमी पाऊस होण्याचा अंदाज गेल्यावर्षी वर्तवण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी मान्सून राज्यात कधी दाखल होतो, ते पाहणं महत्त्वाचं असेल.