मुंबई : मंत्रालयाच्या इमारतीवर जाऊन आत्महत्या करणाऱ्याच्या घटनांचा धसका घेऊन नवीन शक्कल लढविण्यात आली. आत्महत्या किंवा आत्महत्येच्या प्रयत्नांचा घटना गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रालयात घडल्या आहेत. हीच धोक्याची घंटा लक्षात घेऊन मंत्रालयात जाळ्या बसवण्यात येत आहेत. यामुळे आता गच्चीवर जाऊन आत्महत्या करता येणार नाही.
मंत्रालयात होत असलेल्या आत्महत्यांच्या घटना लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय आखण्यात आला आहे. मंत्रालयाच्या इमारतीला जाळ्या बसवण्याचं काम सध्या सुरु आहे. गेल्या आठवड्यात एका तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. काहीच दिवसांपूर्वी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणात पॅरा लिगल स्वयंसेवक असलेल्या ४३ वर्षीय हर्षल सुरेश रावतेचा मृत्यू झाला.
अहमदनगरमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय अविनाश शेटेने कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारनं काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश शेटे वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होता. अखेर वैतागलेल्या अविनाशनं मंत्रालयाबाहेर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
मंत्रालयात विष प्राशन केलेले 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं.
धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची ६०० झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ ४ लाखांचा मोबदला देण्यात आला.इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं.
अखेर आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालय इमारतीच्या भिंतीला जाळ्या
RELATED ARTICLES