मुंबई : भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन आज गुरुवारी संध्याकाळी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक ते दीड तास चर्चा झाली. यामुळे वेगवेगळे तर्क वितर्क लावण्यात येत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवर टीका केली होती. तसेच नाशिक महापालिकेतही मनसेने भाजपला महापौरपदाच्या निवडणुकीत मदत केली होती. राज ठाकरे यांनी आघाडी सरकारने मतदारांचा विश्वासघात करुन सरकार स्थापन केलं. हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही अशीही टीका केली होती. त्यामुळे भाजप मनसे चुचकारण्याचा प्रयत्न तर करत नाही ना अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे भविष्यात मनसे आणि भाजप असं समिकरण जुळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.