मुंबई: युतीमधील सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. सत्तेत भाजपानं सगळी मंत्रिपदं घ्यावी पण मुख्यमंत्रीपद शिवसेनेचंच असल्याची भूमिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांडली.
संजय राऊत म्हणाले, मुद्दा हा खात्यांचा नसून मुख्यमंत्रिपदाचा आहे. गेल्या पाच वर्षांत सुडाचं राजकारण पेटल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. माणूस जेव्हा मोठा असतो, लोकनेता असतो तेव्हा तो अशाप्रकारे यंत्रणा वापरून काम करत नाही. कमकुवत आणि कुवत नसलेलं नेतृत्व असतं त्यांना या उलाढाली आणि उचापती कराव्या लागतात, असा माझ अनुभव असल्याची टीका राऊत यांनी केली.
शिवसेना त्यांच्या भूमिकेवर बारा दिवसापासून ठाम आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील समसमान वाटपावरून दोन्ही पक्षात पेच कायम आहे. भाजप काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.