मुंबई : शिवसेनेला संपवण्याचा भाजपाचा डाव आहे. असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आरोप केला आहे. विधानसभेचा निकाल लागून नऊ दिवस उलटले, तरी सुध्दा युतीमध्ये सत्तासंघर्ष सुरुच आहे. शिवसेना आमदाराच्या आरोपामुळे युतीमध्ये वाद चिघळण्याची शक्यता आहे.
आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, शिवसेनेला समाजसेवा हवी आहे. शिवसेनेत समाजसेवा जास्त आणि राजकारणाला कमी महत्त्व आहे. परंतु भाजपाला सत्ता हवी आहे. भाजपाकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सत्तावाटपा संदर्भात चर्चा न होण्याची अनेक कारणं आहेत. भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे,” असं सत्तार यावेळी म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना हा आरोप केला.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी युतीदरम्यान जे काही सांगितलं तसं ते वागले नाहीत. म्हणून आज अशी परिस्थिती उद्भवत आहे. मोठ्या भावाला छोटं करण्याचं षड्यंत्र रचलं जात असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते ओळखलं आहे,” असं सत्तार म्हणाले. भाजपाला राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती दिसत नाही. त्यांना केवळ खुर्चीची चिंता आहे. युतीमध्ये केवळ आपलं मत मांडून चालत नाही. असेही आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.