मुंबई : गुरूवारी बाप्पांना सर्वत्र निरोप दिला जाईल. निरोपाची सर्वत्र तयारी सुरु आहे. मात्र, अनंत चतुर्दशीला बाप्पांना निरोप देताना हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. पुढील दोन दिवसांत मध्य भारत आणि महाराष्ट्रात पावसाची सक्रियता कमी होणार आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टी, कोकण भागात गुरुवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
पालघर, रायगड, रत्नागिरी आणि नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्य़ांतील घाटमाथ्यावर काही ठिकाणी बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र गुरुवारी विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. मंगळवारी दिवसभरात मुंबई आणि परिसरात काही ठिकाणी २० ते ४० मिमी पावसाची नोंद झाली. किनारपट्टीवरदेखील पावसाचे प्रमाण मर्यादितच राहिले.