मुंबई: भाजप सरकारने आणलेले नागरिकत्व सुधारणा विधेयक संविधान विरोधी असून लोकशाहीला अभिप्रेत नाही. काँग्रेस पक्षाचा याला तीव्र विरोध आहे. भाजप सरकारने संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षातर्फे आज धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आमदार वर्षा गायकवाड, अस्लम शेख, अमिन पटेल, झिशान सिद्दीकी, माजी आमदार चरण सिंग सप्रा, मधू चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरेंद्र बक्षी, मुंबई काँग्रेसचे समन्वयक राजेश भाई ठक्कर, कोषाध्यक्ष संदीप शुक्ला, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, सचिव महेंद्र मुणगेकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारला संविधानाची तमा राहिली नाही. हे सरकार हुकुमशाही पद्धतीने काम करत आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा संविधान विरोधी आहे. या देशाची धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता बंधुभाव, लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने या विधेयकाला तीव्र विरोध केला आहे. मतांच्या राजकारणासाठी भाजप सरकार संविधानाची पायमल्ली करत आहे. काँग्रेस पक्ष याचा तीव्र निषेध करित असून भाजप सरकारविरोधात तीव्र लढा उभारून काँग्रेस पक्ष सरकारचा डाव हाणून पाडेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी या मुद्द्यावरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले की भाजपने लोकशाही पायदळी तुडवण्याचे काम सुरु केले आहे मात्र सर्वोच्च न्यायालय त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही हे विधेयक सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. तर केंद्र सरकारच्या या निर्णयाला काँग्रेस पक्ष कडाडून विरोध करणार आहे. मुंबई शहरात ठिकठिकाणी धरणे आणि निर्दशने करू असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यानी दिला.