मुंबई : ‘व्हॉट्सअॅप’ या मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून देशातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनात सुरू असलेली हेरगिरी निषेधार्ह, संतापजनक आहे. ही हेरगिरी बंद करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी राज्यपालांकडे केली आहे.
धनंजय मुंडे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले असून, त्यामध्ये मुंडे यांनी सांगितले की, ‘व्हॉट्सअॅप’च्या माध्यमातून देशातील जनतेच्या, पत्रकारांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन उघडून त्यातील फोटो, व्हिडिओ, ऑडिओ संवादासारखी वैयक्तिक, खासगी स्वरूपाची सगळीच माहिती काढून घेतली जात असल्याचे उघड झाले आहे. देशातील लोकसभा निवडणुकीच्या काळात २० एप्रिल ते १० मे या कालावधीत एका विशिष्ट संस्थेने मोठ्या प्रमाणात माहितीची हेरगिरी केल्याचे व त्याबद्दल अमेरिकेतील एका न्यायालयात खटला दाखल झाल्याचे वृत्त एका आघाडीच्या दैनिकाने प्रसिद्ध केल्याकडे मुंडे यांनी राज्यपालांचे लक्ष वेधले आहे.
‘व्हॉट्सअॅप’च्या हेरगिरीमागे शासकीय व्यवस्थेतील संस्थांचा सहभाग असण्याची शक्यताही मुंडे यांनी व्यक्त केली. शासकीय यंत्रणांनी यापूर्वीही अनेक प्रकरणांत अशा पद्धतीने नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनात घुसखोरी, हेरगिरी केल्याचे वारंवार समोर आले आहे. हे निषेधार्ह, संतापजनक आहे. नागरिकांच्या फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन उघडणे, त्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात डोकावणे व तेथून त्यांच्या व्यक्तिगत, खासगी, संवेदनशील माहितीची चोरी करणे हा गंभीर अपराध आहे. असेही मुंडे यांनी म्हटले आहे.