मुंबई : आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजपाच्या विरोधातील भ्रष्टाचाराचे अनेक विषय उपस्थित होणार आहे. यामुळेच मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या फेर तपासाची मागणी करणारे विषय भाजपा उपस्थित करीत आहे. यामागे त्यांची निव्वळ राजकीय भूमिका असून, त्यांच्या मागणीत काहीच अर्थ नाही,” अशा शब्दात गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी यांनी आज गुरुवारी भाजपवर निशाणा साधला.
मुंबई येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यावरून भाजपाने फेरतपास करण्याची मागणी केली आहे. याविषयी पत्रकारांशी बोलताना सतेज पाटील म्हणाले, ‘मुंबईतील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आरोपींना तातडीने पकडण्यात आले. अशा प्रकारचा भयावह हल्ला झाल्यानंतर जगाच्या पाठीवर आरोपींना तात्काळ पकडण्याच्या कारवाईतील ही एक कारवाई होती. त्याचा तपास अधिकाऱ्यांनी पूर्ण केला. त्यातून आरोपींना आपल्या भूमीत फाशीची शिक्षा होण्यापर्यंत अधिकाऱ्यांनी चोख काम बजावले. या सर्व प्रक्रियेवर तुम्ही शंका का घेत आहात’, असा प्रश्न पाटील यांनी केला.
हा शहीद पोलीस अधिकारी,कर्मचा-यांचा अपमान…
‘यामुळे जे शहीद झाले. ज्यांनी बलिदान दिले. त्यांच्यावर शंका उपस्थित करण्यासारखे आहे. निव्वळ राजकारण करायचे हाच यामागे भाजपाचा उद्देश दिसतो. आगामी अधिवेशनात भाजपाच्या विरोधातील अनेक विषय येणार असल्याने नको ते विषय काढून त्याविषयी वातावरण वेगळे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तथापि या दहशतवादी हल्ल्याचा योग्यरीतीने तपास होऊन आरोपींना कठोर शिक्षाही झाली असल्याची लोकांना पूर्ण कल्पना आहे,’ असंही पाटील म्हणाले.