मुंबई : मुंबई, पुणे आणि पिंपरीत करोनाचे आणखी तीन रुग्ण आढळले असून राज्यातील करोना रुग्णांची संख्या ५२वर पोहोचली आहे. करोनाच्या ५ संशयित रुग्णांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असून त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील करोना रुग्णांची माहिती दिली. राज्यातील १०३५ रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांची टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ९७१ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. काल आणखी पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. मात्र, या पाचही जणांवर १४ दिवस लक्ष ठेवण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. तसेच मुंबई, पुणे आणि पिंपरीत आणखी तीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ५२वर पोहोचली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
करोना व्हायरस संदर्भात घ्यावयाच्या उपाययोजना युद्ध पातळीवर प्रशासनाकडून केल्या जात आहेत. आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मुंबईत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. हाजी अली दर्गा आणि सिद्धिविनायक मंदिरातील दर्शनही बंद करण्यात आलं असून अनेक मुस्लिम बांधवांनी आज शुक्रवार असूनही घरीच नमाज पठन केलं. सर्वच धर्मीयांकडून करोना व्हायरस रोखण्यासाठी मोठ्याप्रमाणावर सहकार्य मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
६ लॅब वाढवणार….
राज्यात येत्या दोन दिवसांत आणखी ६लॅब वाढवण्यात येणार असून ही संख्या १२वर पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रुग्णांवर उपचाराचा कोणताही खर्च येणार नाही. त्याबद्दल त्यांनी निश्चिंत राहावे, असं सांगतानाच महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत अतिदक्षतेतील रुग्णांचा खर्च सरकार करेल, अशी माहितीही त्यांनी दिली.