मुंबई : मी शिवसेना पक्षप्रमुखांना वचनं दिलं होतं मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच. त्यामुळे मला सीएमपदासाठी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांची गरज नाही. अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
उध्दव ठाकरे म्हणाले, प्रथम कोणीतरी ठाकरे घराण्यावर खोटारडेपणाचा आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी अमित शाहांचा दाखला देऊन माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला, पण जनतेला सर्व माहिताय कोण खोटं बोलतंय. शिवसेना प्रमुखांच्या खोलीत बसून चर्चा झाली. अमित शाहांनी देवेंद्र फडणवीसांना माहिती दिली. फडणवीस यांनी आत्ता जाहीर करु नका. वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेल असं म्हटले. तसेच आत्ता सांगितलं तर पक्षात माझी (अमित शाह) अडचण होईल असं नमूद केलं. ते शब्दखेळ करण्यात हुशार आहेत. त्याचा अनुभव मी आत्ता घेतला. असंही उध्दव ठाकरे म्हणाले.
उध्दव ठाकरे म्हणाले, मी खोटारडा म्हणून शिवसैनिकांसमोर जाऊ शकत नाही. जमत नाही असं म्हटलं तर एकवेळ ठिक आहे. पण ठरलंच नाही हे सहन करणार नाही. खोटं बोलण्याचा हिशोब काढला तर अच्छे दिन, नोटबंदीपासून कोण खोटं बोललं हे दिसेल. असा टोलाही लगावला. मी नरेंद्र मोदींवर कधीच टीका केलेली नाही, त्यांनी मला धाकटा भाऊ मानलं आहे, भावा-भावाचं नातं पाहून कोणाच्या पोटात दुखत असेल, तर त्याचा मोदींनी शोध घ्यावा. लोकसभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती केली त्याचा आनंद होता. मात्र, जे झालं गेलं ते गंगेला मिळालं, गंगा साफ केली नसली तरी. गंगा साफ करताना यांची मनं कलुषित झाली. यांच्या मनात सत्तेची लालसा इतक्या स्तरावर जाईन याची कल्पना नव्हती. असंही उध्दव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली. त्यांनी मागील 5 वर्षात जे अचाट कामं केली ते सांगितली. मी त्यांना धन्यवाद देतो. आम्ही त्यांच्यासोबत 5 वर्ष राहिलो नसतो तर त्यांना करता आली नसती. म्हणजेच आम्ही विकासाच्या आड आलो नाही. आम्ही शब्द पाळतो. बाळासाहेबांकडून मी तेच शिकलो आहे. असंही उध्दव ठाकरे म्हणाले.