मुंबई : जेएनयूमधील हिंसाचारावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर तोफ डागली. देशाच्या राजधानीत कधी पोलीस विद्यापीठात जाऊन गोळ्या चालवतात, तर कधी मुखवटा घातलेले हल्लेखोर विद्यापीठांमध्ये धुडगूस घालत हिंसाचार करतात हे योग्य नाही. देशातील विद्यार्थी सुरक्षित नसेल तर देश सुरक्षित राहणार नाही. हे उत्तम कायदा आणि सुव्यवस्थेचं लक्षण नाही अशी टीका केली आहे. असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून निषेध नोंदवत आहेत. मुंबई, पुण्यातही हल्ल्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अनेक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक जखमी झाले आहेत. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोषदेखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
या हल्ल्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह किमान १८ जण जखमी झाले आहेत. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) हात असल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेला हिंसाचार पाहून मला २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तोंड झाकून हल्ला करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे असं सांगताना हल्लेखोरांचा शोध घेऊन कारवाई करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी गरज लागल्यास महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवली जाईल असं आश्वासन दिलं.