मुंबई : नववर्ष स्वागतासाठी घराबाहेर पडणा-या प्रवाशांना त्राल होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेने दिलासा दिला आहे. पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरार या मार्गावर ८ विशेष फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
नववर्ष स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह आणि अन्य ठिकाणी मुंबईकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. मुंबईकरांना व्यवस्थितपणे घरी जाता यावे, यासाठी पश्चिम रेल्वे विशेष फेऱ्या सोडणार आहे. पश्चिम रेल्वेच्या विशेष फेऱ्या मध्यरात्री ३.२५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
मुंबईकरांच्या सोईसाठी रात्री ११.१५ वाजता, मध्य रात्री २ वाजता, २.३० वाजता, आणि ३.२५ वाजता चर्चगेटहून विरारसाठी लोकल रवाना होतील. तर विरारहून चर्चगेटसाठी पहिली विशेष लोकल रात्री १२.१५ मिनिटांनी सुटेल. त्यानंतर मध्यरात्री १२.४५ वाजता, १.४० वाजता आणि ३.०५ वाजता विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेप्रमाणे बेस्ट मंडळानेही सहा मार्गांवर २० विशेष बस सेवा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणाहून बेस्टच्या विशेष बस सोडण्यात येतील, अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली. बस क्रमांक ७ मर्यादित, १११, ११२, २०३, २३१, २४१ या मार्गावरील बस फेऱ्या रात्री प्रवाशांसाठी सोडण्यात येणार आहेत. याशिवाय प्रवाशांची मागणी लक्षात घेता जादा बसेस सोडण्यात येणार आहे.