मुंबई : मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांना चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली. भाषणप्रकरणी उत्तराबरोबर स्पष्टीकरण मागवले.
निवडणुकीच्या या हंगामात नेत्यांकडून भाषणबाजी केली जाते. या सर्व भाषणबाजींवर निवडणूक आयोगाची करडी नजर आहे. मात्र, असे असतांना सुध्दा मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईत १६ ऑक्टोबर रोजी मुंबादेवी मतदारसंघात महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग सकपाळ यांच्या प्रचार सभेत चिथावणीखोर भाषण केले होते.
या वेळी लोढा यांनी भाषणात १९९२ मधील मुंबईतील दंगलींचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, “या दंगलींवेळी स्फोट झाले आणि गोळ्या झाडल्या गेल्या त्या इथून केवळ पाच किमी अंतरावरील गल्ल्यांमधून झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये २५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या लोकांच्या मतांवर जिंकलेली व्यक्ती आपल्या मदतीसाठी कशी येईल,” अशा शब्दांत लोढा यांनी काँग्रेसचे उमेदवार अमीन पटेल यांचे नाव न घेता टीका केली होती. लोढा यांच्या या भाषणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.
लोढा यांनी पुढे म्हटले होते जुन्या इमारती पडल्यानंतर इथल्या रहिवाशांना मानखुर्द आणि धारावीत स्थलांतरीत केले जाते. त्यामुळे असं वाटतं की ही ठिकाणं फक्त काही विशेष समाजाच्या लोकांसाठीच राखीव ठेवण्यात आली आहेत. मात्र, हिंदू-मराठी बांधवांना दूरच्या भागांमध्ये शिबिरांमध्ये जावे लागते. चिथावणीखोर वक्तव्यामुळे लोढा यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. उत्तर बरोबर स्पष्टीकरण मागितले.