मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते बिघडलेली अर्थव्यवस्था, प्रचंड वाढलेली बेरोजगारी अशा गंभीर विषयावर खरे बोलत नाहीत, ते भ्रमक आणि खोटा प्रचार करत आहेत. लोकांच्या भावनांशी खेळत आहेत अशी घणाघाती माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी केली आहे.
राजीव गांधी भवन येथे पत्रकारपरिषदेत बोलताना ते म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था संकटात आहे, बेरोजगारी प्रचंड वेगाने वाढते आहे, देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक उद्योग धंदे बंद पडले, कारखाने बंद पडले, गेल्या पाच वर्षात काय विकास केला? या सगळया प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान व मुख्यमंत्री देत नाहीत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा नवीन इतिहास नव्याने लिहिण्याच्या गोष्टी करत आहेत पण मी या दोघांना सांगू इच्छितो की इतिहास कधीच बदलत नसतो, इतिहास हा इतिहास असतो.
गेल्या पाच वर्षात कोणती नवीन मोठी गुंतवणूक नाही, नवीन कारखाने उभे राहिले नाहीत, नवीन उत्पादन नाही, मागणी नाही त्यामुळे पुरवठा नाही. उत्पादन क्षमता शून्याच्या खाली गेली आहे. नोटबंदी आणि जीएसटी मुळे देशावर आर्थिक संकट निर्माण झालेले आहे. भाजप सरकारकडे यासाठी कोणतीच उपाय योजना नाही. निवडणूक प्रचार संपायला अजून दोन दिवस आहेत सरकारतर्फे कोणीही अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या या विषयांवर माझ्याशी अथवा माझ्या सहकाऱ्यांशी खुल्या चर्चेसाठी जनतेच्या समोर यावे, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले .
आनंद शर्मा पुढे म्हणाले कि नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वप्नात राहू नये. भारताचा जीडीपी दर ५ टक्क्यांवर आलेला आहे. २०२४ मध्ये ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यासाठी १० ते १२ टक्के जीडीपी दर सातत्याने पाहिजे. आधीच १,७०,००० करोडचे नुकसान झालेले आहे म्हणून आरबीआय कडून तुम्हाला १, ७६,००० कोटी घ्यावे लागलेले आहेत. माझ्या माहितीनुसार या वर्षीच्या बजेटमध्ये २४ लाख कोटींचे नुकसान होणार आहे. गेल्या सहा महिन्यात १७ लाख कोटींचे नुकसान झालेले आहे. तसेच या भाजप सरकारला १० लाख कोटी रूपये जीएसटी आणि एक्सपोर्टर्सचे पैसे परत द्यायचे आहेत (Refund ). तसेच PSU चे पैसे परत करायचे आहेत, अर्थ मंत्र्यांनी याची कारणे आणि उत्तरे लोकांना सांगावीत.
वाहन उद्योग, टेक्सटाईल, शेती उत्पादन यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहेत. भाजप सरकारच्या काळात बँकेतील घोटाळे आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला. पीएमसी बँकेच्या विषयावर आनंद शर्मा म्हणाले कि नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री यांनी ज्या हक्काने आरबीआय कडून पैसे घेतले त्याच हक्काला पीएमसी बँकेतील १६ लाख खातेधारकांचे पैसे त्यांना परत देण्याचे आदेश का देत नाहीत ? असा माझा त्यांना सवाल आहे. पीएमसी बँकेच्या खातेधारकांना त्यांनी लवकरात लवकर दिलासा दिलाच पाहिजे. त्यांचे ते स्वतःच्या मेहनतीचे पैसे आहेत. काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी आहे.
ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना इतिहास, घटनाक्रम, अर्थव्यवस्था या गोष्टींचे फार कमी ज्ञान आहे. त्यामुळे ते नेहमी चुकीचा संदर्भ लावत असतात आणि चुकीची माहिती देत असतात. कलम ३७० आणि राम मंदिर या मुद्द्यांवर ते जनतेत गैरसमज पसरवत आहेत. आपल्या देशात दोन समाज निर्माण करत आहेत. भाजप सरकार जाती धर्माच्या नावावर देशामध्ये तेढ निर्माण करत आहेत.
यावेळी मुंबई कॉंगेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी आमदार सुरेश शेट्टी, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार चरण सिंग सप्रा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते राजीव त्यागी आणि मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे उपस्थित होते.