मुंबईत विधानसभेच्या ३६ जागांसाठी ३३४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात ३१ महिला उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये किती महिला बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
३६ पैकी २१ मतदारसंघातून महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत. भाजपा आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांनी मुंबईत फक्त तीन महिलांना उमेदवारी दिली आहे. युतीमुळे भाजपाच्या वाटयाला १७ जागा आल्या असून त्यांनी मनिषा चौधरी, भारती लव्हेकर आणि विद्या ठाकूर या तीन विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मनिषा चौधरी दहीसर, भारती लव्हेकर वर्सोवा आणि विद्या ठाकूर गोरेगावमधून निवडणूक लढवत आहेत.
मुंबईत काँग्रेस २९ जागा लढवत असून त्यांनी फक्त तीन जागांवर महिलांना उमेदवारी दिली आहे. धारावीमधून विद्यमान आमदार वर्षा गायकवाड, घाटकोपर पूर्वेमधून मनिषा सुर्यवंशी आणि कादीवली पूर्वेमधून डॉ. अजंता यादव यांना उमेदवारी दिली. शिवेसना १९ जागा लढवत असून त्यांनी फक्त यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहा जागा लढवत असून त्यांनी दिंडोशीमधून विद्या चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.
११ अपक्ष महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. धारावीमधून सर्वाधिक महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ११ पैकी तिथे तीन उमेदवार महिला आहेत. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, बसपाच्या अनिता गौतम आणि बबिता शिंदे अपक्ष म्हणून धारावीतून निवडणूक लढवत आहेत. किती महिला विधीमंडळात जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.