मुंबई: पोलिसांकडून बेपत्ता मुलीचं शोधासाठी सहकार्य मिळत नसल्याने एका मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील कुर्ला येथे घडली. पंचाराम रिठाजिया असं या वडिलांचं नाव आहे. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी रास्तारोको केला. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
पंचाराम रिठाजिया यांनी मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलीस खात्याकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत आत्महत्या केली होती. त्यानंतर हे प्रकरण चिघळलं आहे. रिठाजिया यांची 17 वर्षीय मुलगी आरती रिठाजिया कुर्ल्यातून मागील 6 महिन्यांपासून बेपत्ता आहे. रिठाजिया यांनी याप्रकरणी आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची लेखी तक्रारही दिली. मात्र, पोलिसांकडून या प्रकरणी गांभीर्य दाखवण्यात आले नाही. यालाच कंटाळून मुलीच्या वडिलांनी आत्महत्येचं पाऊल उचललं.
रिठाजियांच्या अंत्यविधीच्या वेळी संतप्त नागरिकांनी पोलीस प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. काही केला. यावेळी नागरिकांकडून पोलिसांविरोधत घोषणा देण्यात आल्या. दोन पोलीस अधिकारी कर्मचा-यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला आहे. यावेळी नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात 3 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.