महत्वाचे…
१. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारच्या विरोधात डिसेंबर २०१७ पासून हल्लाबोल आंदोलनाला सुरूवात
२. एप्रिल ते १२ एप्रिलपर्यंत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढला जाणार
३. पहिल्या टप्प्यात विदर्भ, दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा आणि तिसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात आंदोलन
मुंबई: राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारच्या विरोधात सोमवार २ एप्रिल पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुन्हा हल्लाबोल आंदोलन सुरू होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर या पाच जिल्ह्य़ांत हे आंदोलन होणार असून, त्याची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्य़ातून होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो. परंतु या आंदोलनाच्या माध्यमातून मागील विधानसभा निवडणुकीत काहीसा डळमळलेला हा गड सावरण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरू आहे. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत २ एप्रिल ते १२ एप्रिलपर्यंत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढला जाणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाची समारोप होणार आहे, मात्र त्याचे ठिकाण व तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे तटकरे यांनी सांगितले.
हल्लाबोल पश्चिम महाराष्ट्रात…
लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारच्या विरोधात डिसेंबर २०१७ पासून हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भ, दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा आणि तिसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात आंदोलन करण्यात आले.