मुंबई : कोरोना व्हायरसचा जगभरात धुमाकूळ सुरु आहे. धोका लक्षात घेता मुंबई पोर्ट ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे. समुद्र मार्गाने मुंबईत येणाऱ्या चिनी नागरिकांना मुंबईत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. चीनमधून येणाऱ्या जहाजांच्या क्रू मेंबर्सना आणि प्रवाशांना फक्त पोर्टवर उतरण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसने चीनमध्ये हैदोस घातला आहे. चिनमध्ये २४,३२४ जणांना झाली आहे. चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी ३,२१९ रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे, तर संपूर्ण देशात उपचारानंतर ८९२ लोक बरे झाले आहेत. या रुग्णांच्या सतत संपर्कात असलेल्या सुमारे अडीच लाकख लोकांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
हजारो लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर चीनमधून येणाऱ्या लोकांसोबत हा व्हायरस भारतात येऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच आता मुंबईत या व्हायरसचा शिरकाव होऊ नये म्हणून मुंबई पोर्ट ट्रस्टने शहरात चिनी लोकांना प्रवेश बंदी केली आहे.
चीनमध्ये कोरोना व्हायरसचा धोका निर्माण झाल्यानंतर तेथील भारतीयांना मायदेशात आणण्यात आलं आहे. चीनमधील वुहानमधून एअरलिफ्ट केलेल्या ६४५ भारतीयांची देशात परतल्यानंतर आरोग्य तपासणी करण्यात आली. या सर्वच्या सर्व ६४५ जणांची ही चाचणी निगेटीव्ह आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
चीनमध्ये आतापर्यंत झाला २४ हजार लोकांचा मृत्यू
चीनमधील जीवघेण्या कोरोना व्हायरसबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे तब्बल २४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. एका चिनी कंपनीचा डेटा लीक झाला आणि ही माहिती उघड झाली.
टेनसेन्ट या कंपनीचा हा डेटा आहे. टेनसेन्ट ही चीनमधील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठी कंपनी आहे. टेनसेन्टच्या आकडेवारीनुसार कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत २४ हजार पेक्षा जास्त मृत्यू झालेत. तर दुसरीकडे चीन सरकारने दिलेल्या माहितीनुसार ५६३ जणांचा मृत्यू झाला आहे.