मुंबई : राज्यातील जनतेला आठवडभरात कधीही येऊन मंत्र्यांकडे त्यांची गाऱ्हाणी मांडता येणार आहे. कारण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आता मंत्रालयाचं कामकाज दररोज सुरू ठेवणार असल्याची माहिती समोर येतं आहे.
साधारणपणे आठवड्यातील तीन-चार दिवस चालणारं मंत्रालयाचं कामकाज आता दररोज सुरू राहणार आहे. उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे दररोज मंत्रालयात हजर राहत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत सहाही मंत्र्यांना मंत्रालयात हजर राहून कामकाज करावं लागत आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी दर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा पायंडाही पाडला आहे. राजकीय दौरे आणि कार्यक्रम वगळता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोज मंत्रालयात हजर राहून कामकाज पाहणार आहेत.
पूर्वी काँग्रेस आघाडीच्या काळात दर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होत असायची. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकाळात दर मंगळवारी कॅबिनेटची बैठक व्हायची. त्यामुळे मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवसच मुख्यमंत्री आणि मंत्री मंत्रालयात हजर असायचे. त्यामुळे इतर दिवशी मंत्रालयातील गर्दीही कमी व्हायची आणि कामकाजही संथ गतीने व्हायचे.
कामकाज जलद गतीने व्हावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोज मंत्रालयात हजर राहणार असल्याने मंत्रालयातील कामाचा निपटारा वेगाने होणार आहे यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेणार आहेत.