मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी ( एनआरसी )च्या माध्यमातून देशात अराजक माजवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केले आहे. सीएए हा आरएसएसचा डाव आहे, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान आणि आरएसएसवर शरसंधान साधले. हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा, असे थेट आव्हान प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र यांना दिले.
दादरच्या खोदादाद सर्कल येथे आज गुरुवारी सीएए विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, पीएम तुम्ही खोटारडे शिवाय काहीच नाही हे सिद्ध करत आहे. गृहमंत्री अमित शहा कायदा लागू करू, असे विधान पंतप्रधानांना न विचारता केले का? जर तसं केले असेल तर शहा यांचा राजीनामा घेणार की त्यांच्याकडून गृहखाते काढणार? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांना यावेळी केला. आर्थिक मुद्दे दुर्लक्ष करण्यासाठी मोदी हे सगळे करत आहेत. भटका विमुक्त हा किती वर्षे डिटेशन्स कॅम्पमध्ये आहे हे माहिती आहे का? काही जमातीना गुन्हेगार ठरवले त्यावेळेस त्यांना डिटेशन्स कॅम्प यात ठेवले गेले होते. ज्यांना डिटेशन्स कॅम्पात जायचे नाही, त्यांनी या सरकारला झोपवण्याची तयारी ठेवा, आंदोलन करण्याची तयारी ठेवा, अन्यथा डिटेशन्स कॅम्पात जायची तयारी करा. ब्राह्मणशाही विरोधात, आंबेडकर फुलेशाही विरोधात लढणार त्याची जागा डिटेशन्स कॅम्प असल्याचेही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी सांगितले.