मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी असणारी सुरक्षा हटवण्यात आली आहे. सुरक्षा हटवण्यापूर्वी केंद्र सरकारकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती असं सांगण्यात आलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. हा निर्णय सुडबुद्धीनं घेतलेला आहे असंही रोहित पवार म्हणाले.
“देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना किंवा कोणता नेता देशासाठी महत्त्वाचा आहे, त्यांना सरकारनं सुरक्षा पुरवणं आवश्यक आहे. सुडबुद्धीनं सुरक्षा हटवण्यासारखा निर्णय घेणं अयोग्य आहे,” असं रोहित पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नसतानाही त्यांना सुरक्षा देण्यात आली असल्याचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणावरही आपलं मत व्यक्त केलं. “फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ज्यांचा कोणाचा यामध्ये सहभाग आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असे प्रकार घडत असतील तर यापुढे सर्वसामान्यांचेही फोन केले जाऊ शकतात. यावर चाप लावणं आवश्यक आहे. सरकार त्या दृष्टीनं नक्कीच प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे,” असंही ते म्हणाले.
“केंद्र सरकारने जाणुनबुजून शरद पवारांची सुरक्षा कमी केल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सुरक्षा काढली म्हणून शरद पवार घराबाहेर पडणार नाहीत का ?” असा सवालही त्यांनी केला आहे. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान तैनात होते. मात्र २० जानेवारीपासून ही सुरक्षा हटवण्यात आली आहे. सुरक्षा काढण्याआधी कोणताही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती अशी माहिती शरद पवारांच्या दिल्लीमधील कार्यालयाकडून देण्यात आली.