मुंबई: शिवसेना भाजपामध्ये जे लोकसभेच्या वेळी ठरलं होत त्यावर शिवसेना ठाम आहे. शिवसेनेच्या आजच्या मातोश्रीवर बैठकीत आमदारांमध्ये तोच निर्णय घेण्यात आला. शिवसेना नेते आमदार शंभूराजे देसाई यांनी आमदारांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
शिवसेना भाजपामध्ये निकालापासून सत्तावाटपावरून पेच कायम आहे. शिवसेनेचाचं मुख्यमंत्री होणार या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक आज गुरुवारी मातोश्रीवर संपन्न झाली. जो निर्णय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे घेतील तो निर्णय सर्व आमदारांना मान्य राहिल असा निर्णय मातोश्रीवर बैठकीत झालं. अशीही माहिती देसाई यांनी दिली.
भाजप सोबत कोणत्याही परिस्थितीत शिवसेना जाणार नाही हे शिवसेननं स्पष्ट केल आहे. भाजपकडे 145 आमदार असतील तर त्यांनी सरकार स्थापन करावं. आमच्या त्यांना शुभेच्छा आहे. अस संजय राऊत यांनी आज गुरुवारी सकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं. सत्तासंघर्षाला 14 दिवस उलटले असून युतीला कौल मिळाल्यानंतरही सरकार स्थापन झाल नाही. महाराष्ट्रातील तेराव्या विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपणार आहे. तोपर्यंत नवे सरकार अस्तित्वात येऊन हंगामी अधिवेशन होण्याची गरज आहे. अन्यथा राष्ट्रपती राजवटीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता शिवसेनेने डावपेच आखायला सुरुवात केली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.