मुंबई : जगभरात कोरोनाचा भूत नागरिकांच्या मानगुटीवर बसला आहे. भारतात कोरोनाने तीन बळी घेतले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा हैदोस रोखण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. अनेक शहरांमध्ये विविध व्यवसाय बंद ठेवण्यापासून ते कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचाराबाबत सरकारकडून जोरदार हालचाली करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.
‘राज्यभरात आतापर्यंत ४३ जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. सर्वांची परिस्थिति स्थिर आहे. गर्दी टाळण्यासाठी एपिडेमिक कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र खासगी लॅबना अजून कोरोना चाचणी करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. नायडू रूग्णालयात १०० तर वाय.सी.एम. रूग्णालयात ६० बेड्स सुरू करण्यात आले आहेत. तर वर्क फ्रॉम होमची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे,’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
आरोग्यमंत्र्यांनी ‘या’ केल्या घोषणा…
- कोरोनाव्हायरच्या चाचणीसाठी महाराष्ट्रात येत्या आठवड्याभरात सुरू होणार 8 नव्या लॅब. उद्यापासूनच ४ नव्या लॅब सुरू होणार हाफकिन्समध्येही होणार कोरोनाव्हायरसची चाचणी
- राज्यातली क्वारन्टाइनसाठीचे बेड वाढवले.
- आयसोलेशन वॉर्ड वाढवले.
- पुण्यातील ८ खासगी रुग्णालयांना विलगीकरण्यासाठी परवानगी
- लवकरच केंद्राकडून कोरोनाव्हायरससंदर्भातल्या १०,००० किट मिळणार
दरम्यान, राज्यात आज आणखी एका करोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४२ झाली आहे. त्यातील एका व्यक्तीचा काल मुंबईत मृत्यू झाला आहे. कोरोनाबधित ३२ वर्षीय महिला नेदरलँड वरुन दुबई मार्गे पुण्यात आलेली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यातील रुग्णांची माहिती…
- पिंपरी चिंचवड मनपा – १०
- पुणे मनपा – ८
- मुंबई – ७
- नागपूर – ४
यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण प्रत्येकी ३, रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद प्रत्येकी १ असे एकूण ४३ रूग्ण झाले आहेत.
राज्यात ५८ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण १२२७ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ९५८ जणांना भरती करण्यात आले होतं. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ८५६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४२जण पॉझिटिव्ह आले आहेत.
नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १२२७ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.