मुंबई : भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो रो सेवा आज रविवारपासून (१५ मार्च) सुरू होत आहे. या जलवाहतूक सेवेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊचा धक्का ते मांडावा जेट्टी रो रो सेवेला सुरुवात महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रासाठी आकर्षण ठरलेल्या या रो रो सेवेला आज दुपारपासून सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊचा धक्का ते मांडावा जेट्टी रो रो सेवेला सुरुवात हा महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल अशी ही घटना. या सेवेमुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळणार आहे. शासनाने मांडावा जेट्टी येथे यासाठी सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाचे योगदान दिले असून किनारपट्टीच्या भागात सर्वत्र अशी जलवाहतूक सुरू करता येईल का ते आम्ही पाहत आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या सेवेनिमित्त रायगड व कोकणवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. रायगडसह कोकणात चिपळूणपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही फेरीसेवा उपयुक्त ठरेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.
भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल अशी घटना आहे. या सेवेमुळे किफायतशीर व पर्यावरणस्नेही जलवाहतुकीला प्रोत्साहन मिळेल असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले. pic.twitter.com/dm1H3ECXYg
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 15, 2020
फेरीसेवेचा औपचारिक उद्घाटन सोहळा रद्द…
‘कोरोना’ प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांनुसार फेरीसेवेचा आज होत असलेला औपचारिक उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट पवार यांनी या फेरीसेवेच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मराठा आरमाराचे प्रमुख, सरखेल कान्होजी आंग्रे यांचा वारसा, एका आधुनिक पद्धतीनं आपण पुढे नेत आहोत, यासेवेमुळे, भाऊचा धक्का ते मांडवा प्रवास केवळ पाऊण तासात पूर्ण होणार आहे. प्रवाशांचा वेळ आणि इंधनात बचत होईल. मुंबई-गोवा मार्गावरची वाहतुक कोंडी कमी होण्यासही मदत होईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
किनारपट्टीमध्ये जलवाहतूक फायदेशीर ठरेल हे लक्षात घेऊन अशी सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भाऊचा धक्का ते मांडवा हे समुद्री अंतर १९ किमी असून या जलवाहतुकीने १ तासात कापता येते.रो पॅक्सची क्षमता एकावेळी ५०० प्रवासी आणि १४५ वाहने नेण्याची आहे. pic.twitter.com/W0Ww3Aylks
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 15, 2020
चार तासाचा प्रवास तासाभरात होणार…
भाऊचा धक्का ते अलिबागमधील मांडवा हे १२५ किलोमीटरचे अंतर रस्त्याने गाठण्यासाठी सध्या तीन ते चार तासांचा कालावधी लागतो. मात्र रो-रो सेवामुळे केवळ एका तासातच मांडवा गाठता येणार आहे. यासाठी ग्रीसहून मुंबईत आणल्या गेलेल्या बोटीची ३०० हून अधिक लहान-मोठी वाहने व तितकेच प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.