मुंबई: शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. त्यामुळे बंदुकीच्या गोळ्या खाण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही, असा निर्वाणीचा इशारा किसान सभेचे सरचिटणीस आणि शेतकरी मोर्चाचे नेते अजित नवले यांनी दिला.
नाशिक ते विधानभवन असा शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा ठाण्यातील मुक्कामावरून निघाल्यानंतर नवले यांना सांगितले. त्यावेळी त्यांनी ४० हजारांहून अधिक संख्येने रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांचा निर्धार बोलून दाखवला. गेली अनेक वर्षे सरकार, व्यापारी आणि सावकारांनी शेतकऱ्यांना लुटले आहे. जे लुटले आहे तेच आता आम्ही परत मागत आहोत. विधानभवनाला घेराव घालण्यासाठी शेतकरी आता सज्ज झाले आहेत. आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही घेराव मागे घेणार नाही, असे देखील नवले यांनी ठणकावून सांगितले आहे.