मुंबई : अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक निकष मराठी भाषा पूर्ण करते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका पत्रकाव्दारे केली आहे. स्वत: पंतप्रधानांनी लक्ष घालून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली आहे. संबधितांना आदेश द्यावे अशीही विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकात केली आहे.
#मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना पत्राद्वारे विनंती pic.twitter.com/YHBXTwqnle
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 24, 2019
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालाच्या आधारे १६ नोव्हेंबर २०१३ ला प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, अनेकवेळा पाठपुरावा करुनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्यमंत्रालयाकडे प्रलंबित आहे.
दरम्यान, सदर विभागाने साहित्य अकादमीच्या भाषा समितीकडे विचारार्थ असल्याचे सांगितले आहे. ब-याच वर्षापासून हे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालून मराठीला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रात सांगितले आहे.