लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उत्तर मुंबईतून निवडणूक लढवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीमाना दिल्याचे उर्मिलाने म्हटले आहे.
पक्षातील अंतर्गत राजकारणावर मी 16 मे रोजी पत्र लिहले होते. पण त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. मी ज्यांच्याविषयी तक्रारी केल्या होत्या. त्यांनाच पद देण्यात आल्याची तक्रार देखील उर्मिलाने केली आहे. राजकारणात माझा कोणी वापर करू नये असे मला वाटते. म्हणून मी पक्षातून बाहेर पडत असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच यापुढेही मुंबईसाठी आणि लोकांसाठी मी काम करत राहणार असल्याचे उर्मिलाने सांगितले.
मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी उर्मिलाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी दिल्लीत तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांना उत्तर मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देखली दिली होती. प्रचारात उर्मिलाने मोदी सरकारविरुद्ध जोरदार प्रचार केला होता. मात्र 23 मे रोजी जाहीर झालेल्या निकालात भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता. या पराभवानंतर देखील उर्मिलाने राजकीय प्रतिक्रिया दिल्या होत्या. पण अखेर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे सांगितले.