मुंबई: अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे भाज्यांना मोठा फटका बसला आहे. भाज्या किरकोळ बाजारात शंभरीपार गेल्या आहेत. कांदा सत्तरीत गेला आहे. यामुळे नागरिकांच्या बजेटवर त्याचा परिणाम झाला आहे.
अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. पिकांचे, फळभाज्यांचे नुकसान झाले आहे. या बदललेल्या वातावरणाचा भाज्यांवर विपरित परिणाम झाला आहे. बाहेर गावाहून मुंबईत येणाऱ्या ५० ते ७० टक्के भाज्या पावसामुळे कुजल्या आहेत. परिणामी हाती उरलेला थोडाफार माल प्रचंड चढ्या भावाने विकला जात आहे.
नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजारात आवक अधिक असली तरी पावसामुळे माल खराब झाला आहे. पावसापासून वाचण्यासाठी गाडीवर ताडपत्री लावावी लागते. ताडपत्री लावली की आतील भाजीला हवा मिळत नाही. त्यामुळेही माल खराब होतो.
मुंबईत या काळात गुजरात, मध्यप्रदेश व कर्नाटकमधूनही भाजी येते. पण बाहेरील राज्यातही यंदा पाऊस अधिक होता. तेथेही अवकाळी पाऊस सुरूच आहे. त्यामुळे राज्यातील माल खराब असताना बाहेरून भाजी मागवणेही शक्य नाही. एकूणच चांगल्या भाजीची बाजारात वानवा आहे. त्यातून दर गगनाला भिडले आहेत.