मुंबई : मुंबई महापालिकेने रस्तांवरील वाहतुकीस अडथळा निर्माण दूर करण्यासाठी मोठा निर्णय घेत आहेत. मुंबईत मोकाट फिरणाऱ्या गाई, बैल, म्हैस आदींच्या उपद्रवामुळे पादचाऱ्यांनाच नव्हे तर वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतो, अपघात होतात. याची गंभीर दखल मुंबई महापालिकेने घेतली आहे. मोकाट फिरणाऱ्या जनावरांवरील दंडात्मक कारवाईचा बडगा अधिक तीव्र करण्यात येणार आहे. मोकाट जनावरांच्या मालकांकडून प्रति जनावर 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यामुळे जनावर मालकांना जनावरांची काळजी घ्यावी लागणार आहे.
मोकाट फिरणाऱ्या जनावरांची पालिकेतर्फे धरपकड केली जाते. अशा जनावरांची रवानगी पालिकेच्या कोंडवाडय़ात केली जाते. त्यानंतर जनावराचे मालक दंडाची रक्कम भरुन जनावर सोडवून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. याची दखल घेऊन नगरसेविका नेहल शाह यांनी दंडाची रक्कम वाढवावी, अशी मागणी पालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती.
नगरसेविका नेहल शाह यांच्या मागणीची दखल घेत पालिका प्रशासनाने दंडाची रक्कम 10 हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्तावही तयार करण्यात आला असून या प्रस्तावाला पालिका सभागृहाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. यामुळे जनावर मालकांना काळजी घ्यावी लागणार आहे.